जिल्हाधिका-यांकडून धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा




जिल्हाधिका-यांकडून धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

◾भोजनदान तसेच इतर कोणत्याही प्रकारचे स्टॉल रस्त्यावर न लावण्याचे आवाहन

चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमी वर साज-या होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 26) आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सा. बां. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के, प्रा. दिलीप रामटेके उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, गाड्या तसेच बसेसची पार्किंग व्यवस्था, शहरातील पुतळ्याची स्वच्छता, दीक्षाभुमी परिसराची स्वच्छता, पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा आदी कामे संबंधित विभागांनी गांभिर्याने पूर्ण करावीत. कार्यक्रमादरम्यान या परिसरातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये,  तसेच रस्त्यावर किंवा झाडांवर लटकणा-या विद्युत तारांची त्वरीत तपासणी करावी. दोन दिवसात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे गर्दीचे योग्य नियोन करावे. बाहेर गावावरून येणा-या बसेसच्या पार्किंगची ठिकाणे आत्ताच निश्चित करावी. महानगर पालिकेने दीक्षाभुमी परिसरातील आजुबाजुच्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच साफसफाईची कामे करावी. मोबाईल टॉयलेट, हायमास्ट लाईट, कार्यक्रमाच्या ठिकाणी अग्निशमन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात.

रस्त्यावर स्टॉल नको : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून भोजनदानाचे तसेच इतर स्टॉल लावण्यात येतात. सदर स्टॉल रस्त्यावर न लावता चांदा क्लब ग्राऊंडच्या आतमध्ये लावावेत, याची सर्व सामाजिक संघटनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आचारसंहितेचे पालन करा : या कार्यक्रमादरम्यान निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रॅलीमध्ये कोणतेही राजकीय भाषण होऊ नये, तसेच या परिसरात राजकीय जाहिरातींचे होर्डींग्ज टाळावे. याबाबत कार्यक्रमाच्या आयोजकांनी राजकीय नेत्यांना अवगत करावे, अशीही सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.




Post a Comment

0 Comments