निश्चीत ध्येय ठेवून देशाला विश्वगौरव बनवा – आ. सुधीर मुनगंटीवार
◾सेंट पॉल स्कुल बामणी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले या महामानवाने शिक्षणाच्या माध्यमातुन आमुलाग्र बदल घडवून समाजउत्थानाचे कार्य केले आहे. तळागाळातील शोषीत, पिडीत समाजाला समाजभान देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक १३ एप्रिल २०२२ रोज बुधवारला सेंट पॉल स्कुल बामणी (ता. बल्लारपूर) येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भाजपाचे वरिष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, माजी जि.प. सदस्य अॅड. हरीश गेडाम, मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार, सेंट पॉल स्कुल बामणीचे संचालक निना खैरे, सचिव अविनाश खैरे, शाळेच्या प्राचार्य मेनका भंडुला व रमा कांबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना चंद्रपूर जिल्हा हा कायमच देशसेवेसाठी समर्पण भावनेनी पुढे आला आहे. १९४२ च्या चले जाव क्रांतीमध्ये चिमूरच्या क्रांतीभूमीतून तिव्र लढा देवून ब्रिटीशांच्या युनियनजॅक खाली उतरवून भारतीय तिरंगा आकाशात फडकविण्यात आला. भारत-चीन युध्दावेळी पंडीत नेहरूंनी सुवर्णदानाची मागणी करताच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.सां. कन्नमवार यांनी चंद्रपूर जिल्हयातून सर्वाधिक सुवर्णदान केले. ही दातृत्वाची भावना आपल्या चंद्रपूर जिल्हयात आहे. चंद्रपूर जिल्हयात जगातील सर्वाधिक वाघ आहे. हे वाघ शौर्य व पराक्रमाचे प्रतीक आहे. त्यामुळे या शौर्य व पराक्रमाला उराशी बाळगुन व निश्चीत ध्येय ठेवून आपण अभ्यास करून आईवडीलांसोबतच देशाचाही गौरव वाढवाल अशी मला खात्री आहे. जीवनामध्ये महामानवांच्या विचारांचे, आचारांचे पालन करून आपले ध्येय गाठत भारतमातेला विश्वगौरव बनविल्याशिवाय थांबवू नका. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पुर्ती करा. निश्चीत ध्येय ठेवून व वर्षभराचे नियोजन करून अभ्यास करा असेही मार्गदर्शन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
0 Comments