२ मुलासह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


२ मुलासह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या  

◾नवऱ्यासोबतच भांडण लेकरांच्या जीवावर बेतलंय !

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ घरगुतीवादातून एका विवाहितेनं आपल्या दोन लेकरांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीसोबत वाद झाल्यामुळे या महिलेनं टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरी शहराजवळ असलेल्या मालडोंगरी इथे  ही घटना घडली आहे. दीपा रवींद्र पारधी ( वय 33 ) असे मृतक महिलेचे नाव आहे.

तर आयुष रवींद्र पारधी ( वय 6 ) आणि पियुष रवींद्र पारधी ( वय 3 ) अशी मृत बालकांची नावे आहेत. मालडोंगरी येथील रवींद्र मुरलीधर पारधी व त्यांची पत्नी दीपा रवींद्र पारधी, आयुष आणि पियुष ह्या दोन मुलांसह राहत होते.

घटनेच्या आधीच्या रात्री पती रवींद्र आणि पत्नी दीपा यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरून निघून गेली होती. पत्नी रागारागा घर सोडून गेल्यामुळे पती रवींद्र याने नातेवाईक-शेजार्‍यांसह शोधाशोध केली पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.

सकाळी मालडोंगरीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपा ,आयुष व पियुष या तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेहमीच होणारे पती-पत्नीतील वाद यामागचे कारण असावे अशी शंका आहे. ब्रह्मपुरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments