पावसाने बळीराजाला पुन्हा रडवलं; धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या

पावसाअभावी पेरण्या संकटात सापडल्या असून या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये 4 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होते. यात प्रामुख्याने दोन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते.



धुळे : राज्यात मान्सूनचं आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. पण गेल्या काही दिवसांमध्ये मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अद्यापही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना पूर्ण उलटूनही या दोन्ही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पाऊस नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. अशात या महिन्यात तरी पाऊस चांगला होईल अशी आशा शेतकऱ्यांवर आहे.

धुळे जिल्ह्यात अवघ्या 24 टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात फक्त 12 टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाअभावी या पेरण्या संकटात सापडल्या असून या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये 4 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होते. यात प्रामुख्याने दोन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते.

मात्र, यावर्षी जून महिन्यामध्ये सरासरीच्या केवळ 18 टक्के पाऊस झाला. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना उलटूनही पेरण्या झाल्या नसल्याने घरात आणून ठेवलेले बियाणं आणि खतांचा साठा पाहून शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. पाऊस नसल्याने पीक करपायला लागले आहेत. 7 जुलैपर्यंत पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. धुळे जिल्हापेक्षा वाईट परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. या जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपर्यंत खरीप हंगामाची लागवड केली जाते. त्यापैकी केवळ 36 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड झालेली आहे. सरासरीच्या फक्त बारा टक्के पेरण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. पावसाचे प्रमाणही अत्यल्प आहे. पाऊस पडत नसल्याने पेरण्या करणार कश्या? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

Post a Comment

0 Comments