तालुका स्तरावर होणार 11 वी सीईटीची परीक्षा

 


तालुका स्तरावर होणार 11 वी सीईटीची परीक्षा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी घेतली जाणारी सामाईक प्रवेश परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे. त्यासाठी तालुका स्तरावर केंद्र तयार केले जात आहे. यासाठी केंद्राची चाचपणी सुरू आहे. ज्या तालुक्यातून जास्त प्रमाणात विद्यार्थी परीक्षा देतील त्या ठिकाणी जादाचे केंद्र स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनच ही परीक्षा घेतली जाणार असल्याने एका बाकावर एक विद्यार्थी झिकझॅक पद्धतीने बसविण्यात येणार आहे. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी अर्ज करीत आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहे. राज्य बोर्डाशिवाय सीबीएसई, आयएससीई व इतर राज्याच्या बोर्डाचे एकूण १५ लाखाहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशाची सीईटी देतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी केवळ राज्य बोर्डासह सीबीएसई, आयएससीई व इतर राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राज्यात प्रवेश घेण्यासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. यासाठी १७८ रुपये शुल्कासह इतर शुल्काचा समावेश आहे. त्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २० जुलै ते २७ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या सूचनांनुसार राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी शालान्त प्रमाणपत्राचा फोटो अपलोड करावा लागेल व तशी दुरुस्ती करावी लागेल. सीबीएसई सह इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फोटो आयडी, पासपोर्ट साईज फोटो, नमुना स्वाक्षरी व इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र निवडण्याची सुविधा असून त्यानुसार विभाग निश्चित करावा लागणार आहे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास तशी माहिती व सोबतची कागदपत्रे जोडावी लागणार आहे. प्रक्रीया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज दाखल करावे लागणार आहे. विद्यार्थी व पालकांचे समाधान करण्यासाठी बोर्डाच्या हेल्पलाईनशी संपर्क करता येईल.






Post a Comment

0 Comments